Thursday, 23 January 2020

१२ महिने २४ किल्ले ! #1. गरुडाचे घरटे ! "तोरणगड" (प्रचंडगड)


१२ महिने २४ किल्ले

१.  तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे 



हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे तोरण लावतात. मी करू घातलेल्या वर्षभराच्या सणाचं तोरण म्हणून मी पहिला किल्ला तोरणागड निवडला. शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असंही म्हणतात. २०१८ च्या उत्तरार्धापासून "१२ महिने २४ किल्ले" हि संकल्पना मनात थैमान घालून होती. पण किल्ले फिरायचे म्हणजे ट्रेकिंग आलंच. आणि त्यासाठी सराव हा असायलाच हवा. जो मी साधारण नोव्हेंबर २०१८ पासून सुरु केला होता. तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी चढला. हि गोष्ट मला तोरणा चढताना प्रेरणा देणारी ठरणार होती. म्हणूनही बहुदा मी तोरणा निवडला असावा.

मोहिमेतील पहिलाच किल्ला असल्याने दुसऱ्या दिवशी आपण थकून जाणार याची कल्पना होती. त्यामुळे जोडून २ दिवस सुट्टी मिळेल अशा दिवशी जायचं ठरलं आणि २६ व २७ जानेवारी असा मुहूर्त निघाला. 
माझ्या सोबत ऑफिसमधले निखिल, अजित, राहुल, गौरव हे सगळे येणार होते. २६ ला सकाळी ७ वाजता सगळ्यांनी मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूर फाट्यावर भेटायचे असे ठरले.
त्यादिवशी सकाळी जरा जास्तच थंडी होती. त्यामुळे सगळं काही एकदम झाकून पाकून मी सकाळी ६.१५ ला माझ्या गावावरून निघालो. बाकीचे सगळे जण पुण्यावरून येणार होते. नियोजनातील पहिलाच गड आज सर करायची उत्सुकता प्रचंड असल्याने मी गाडी अगदी सुसाट चालवत होतो. वेळेत पोहोचायचे देखील होते. तरीही ठरल्याप्रमाणे पोहोचायला मला २० मिनिटे उशीर झालाच. सगळे पोहोचले होते. अजित आणि निखिल सोबत त्यांचे पुण्यातले दोन मित्रही आले होते. म्हणजे आम्ही एकूण ७ जण झालो होतो. फोटो काढण्यासाठी मी माझा DSLR आणलेला पाहून सगळेजण एकदम खुश झाले. सगळ्यांची गळाभेट करून आम्ही तोरण्याच्या दिशेने निघालो. सगळ्यांचा उत्साह पाहून "वेडात मराठे वीर दौडले सात" असाच अनुभव क्षणभर आला. सगळे माझ्या अगोदर आल्याने त्यांचा चहा पाणी झाला होता, मी मात्र उशिरा आल्याने मला चहा न घेताच तसंच थंडीनं कुडकुडत पुढे निघावं लागलं.
आता आम्हाला सर्वात पहिले वेल्हे गावात पोहोचायचं होत. जे गडाच्या पायथ्याला आहे. वेल्हे गाव तालुक्याचं ठिकाण असल्यानं तिकडे जाणारा रस्ता चांगला आहे. रस्त्याने जाताना डाव्या हाताला कानंद नदीचं खोर दिसतं. त्याच्यापलीकडे नसरापूर पासून सुरु झालेली एक डोंगररांग अगदी तोरणा गडापर्यंत एकसलग जाऊन पोहोचते. पाच दहा किलोमीटर दुरूनच नजरेला तोरणा गड दिसू लागतो. आणि तो एकदा दिसायला लागला कि कधी एकदा तिथे पोहोचू असे होते.


साधारण ८ वाजताच्या दरम्यान आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. कुणीच काही खाऊन आलेलं नसल्याने थोडस खाऊन मग गड चढायला सुरुवात करायची असे ठरले. सगळ्यांनी भक्कम नाष्टा केला आणि आम्ही पुढे निघालो. गडाचा पहिला टप्पा गाडीवरच पूर्ण होतो. गावातून पार्किंग पर्यंतचा रस्ता सुरुवातीला थोडासा सोडला तर सगळा सिमेंटचाच आहे. पण एकावेळी एकच गाडी जाऊ शकेल एव्हढा अरुंद, त्यामुळे चारचाकी घेऊन जाणार असाल तर काळजी घ्या. पार्किंगला गाड्या लावून सगळ्यांनी थोडा वेळ फोटोसेशन केलं आणि आम्ही गडाकडे वळलो. समोर गड पाहिला 
तो तिथूनच एव्हढा मोठ्ठा दिसला आणि छातीत धस्सच झालं. काही क्षण डोळे मिटले आणि जरा इतिहासात डोकावलं. आणि शिवाजी नावाचं एव्हढस लेकरू वयाच्या १६ व्या वर्षी हा गड चढतंय असं चित्रच समोर उभं राहील आणि ऊर्जेची एकलहर अंगभर चमकून गेली. आणि सुरु झाला तोरणाच्या चढणीचा प्रवास.

वेल्हे गावापासून किल्यावर जाईपर्यंत चढणीचे तीन टप्पे पडतात पहिला गावापासून पार्किंग पर्यंतचा जो आम्ही गाडीवरच पूर्ण केला. दुसरा पार्किंग पासून कठीण चढणीपर्यंतचा, आणि तिसरा कठीण चढणीपासून वर गडावर पोहोचेपर्यंतचा. ९ वाजून गेले होते तरी थंडी अजूनही जाणवत होती. तिचा फायदाही होत होता कारण चालून कुणी म्हणावं तेव्हढं दमत न्हवतं. दुसरा टप्पा चढून जायला साधारण अर्धा तास लागला. तिथून कानंद नदीचं खोर आणि नदीवर असलेल्या गुंजवणी धरणाच्या पाणीसाठ्याचं दृश्य अगदी विलोभनीय असं दिसत. जरा वेळ तिथे विश्रांती घेऊन फोटो वगैरे काढून आम्ही पुढे निघालो.







आता आमचे खरे कसब पणाला लागणार होते कारण आता खरा चढणीचा अवघड प्रवास आम्ही करणार होतो. अगदी हा टप्पा सुरु झाल्यापासून कधी डावीकडे तर कधी उजवीकडे आधारासाठी रेलिंग असल्याने चालताना विशेष कसरत करावी लागत न्हवती.
 

मधेच पाणी पिण्यासाठी काही क्षण थांबून आम्ही आमची वाटचाल चालूच ठेवली. जसजसे आम्ही वर चढू लागलो तसतसे किल्ल्याला लाभलेल्या कातळ कड्याची भव्यता जाणवू लागली. आता बिनीचा दरवाजा नजरेच्या टप्प्यात आला. जराशी सपाट पायवाट चालून संपली कि या दरवाज्यापाशी पोहोचण्यासाठी परत एकदा कंबर कसावीच लागते. तिथेच एका खडकावर काही माकडांची पिल्ले अगदी सहजतेने उभ्या खडकावर वर-खाली करतायेत हे पाहून मला त्यांचं भलतंच कौतुक वाटलं. मग बाकी एका दमात हि चढण चढून जायचं असा मी निर्धारच केला आणि एका हातात कॅमेरा पकडून मी झप-झप एका दमात ती चढण चढून पहिल्या दरवाजात येऊन पोहोचलो.

बिनीचा दरवाजा

तसा आकारमानाने हा दरवाजा लहान आहे. पहारेकऱयांसाठीच्या देवड्या, लाकडी दरवाजा लावण्यासाठीच्या दगडी खोबण्या, दगडी महिरपी कमान अशी एकंदरीत दरवाजाची रचना होती. दरवाजाच्या वर जाण्यासाठी डाव्या बाजूने पायऱ्यादेखील आहेत. पण त्या मार्गावर माकडे जास्त असल्याने मी काही तिकडे जाण्याचं धारिष्ट्य केलं नाही कारण, एका जोडप्याच्या हातातील पाण्याची बाटली काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने माकडाने पळवून नेलेली मी पाहिली होती. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही जाल तेव्हा जरा जपूनच. आता इथून पुढे कमी जास्त उंचीच्या पायऱ्या होत्या. त्यामुळं आपसूकच कसरत कमी होणार होती. बिनीच्या दरवाजातूनच वर पाहिल्यास गडाच्या मुख्य कोठी दरवाजाचे दर्शन होते.

कोठी दरवाजा

एकंदरीत या महादरवाज्याच्या आकारमानावरून हा गडाचा मुख्य दरवाजा असावा असा अंदाज बांधता येतो. दरवाजाची रचना गोमुखी आकाराची आहे. म्हणजे गायीने तिचे तोंड जर तिच्या पोटाकडे वळविले तर त्यावेळी तिच्या मानेचा जो आकार बनेल अशा आकाराची रचना. दरवाजाचे दगडी बांधकाम आजही भक्कम आहे. गरजेच्या ठिकाणी संवर्धनाचं काम झाल्याने बिनीच्या दरवाजापेक्षा हा दरवाजा सुस्थितीत आणि देखणा आहे. तिथल्या वातावरणात जरासं एकरूप व्हायचा प्रयत्न केला. तर कोठी दरवाजाच्या डागडुजीवेळी मावळ्यांना सापडलेला धनाचा साठा आणि मावळ्यांना झालेला आनंद याच चित्र समोर दिसू लागलं. हो खरंच तुम्ही सुद्धा अनुभवू शकता फक्त एकरूप होता आलं पाहिजे. थोडा वेळ बसून आता आम्ही पुढे निघालो. दरवाज्याच्या उजव्या बाजूच्या तटबंदीने पुढे गेलो तर मेंगाई मातेचं मंदिर आणि पुढे कोकण दरवाजामार्गे बुधला माचीकडे जाता येते. आम्ही डाव्या बाजूने पहिल्यांदा झुंजार माचीकडे जाण्याचे ठरविले. पुढे किल्ल्याच्या संवर्धनासाठी तयार केल्या जाणाऱ्या चुन्याची भट्टी दिसली. भट्टीला वळसा घालून आम्ही डावीकडे असलेल्या खोकड टाक्याकडे वळलो. मला तर हे टाके टाक्यापेक्षा तळेच जास्त वाटले. गौरव ने सांगितले, हे पाणी पिण्यायोग्य आहे मग मी आणि गौरव पाणी पिण्यासाठी खाली उतरलो. पाण्यात हात घातला तर पाणी फ्रीजमधल्या पाण्यापेक्षाही थंड होते ओंजळीने पोटभरून पाणी प्यायलो. आणि रिकाम्या झालेल्या बाटल्याही भरून घेतल्या. फोटोसेशन चालूच होते सगळ्यांचे. तिथून वर चढून आम्ही तटबंदीवर आलो. आणि समोर बघितले तर समोर दिसत असलेले कानंद नदीचे खोरे मघापेक्षाही विलोभनीय वाटले. तटबंदीवरुन चालत चालत आम्ही सदरेच्या जागेपर्यंत येऊन पोहोचलो. तिथे भल्या मोठ्या ध्वजस्तंभावर भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता. २६ जानेवारी असूनही वेळेअभावी सकाळी ध्वजवंदनाला जाऊ न शकल्याचं शल्य मनात तर होतंच पण तेही इथं पूर्ण झालं. ध्वजाला वंदन करून आम्ही झुंझार माचीला जाण्यासाठी शिडीने खाली उतरू लागलो.

झुंजार माची

या माचीवर जाण्यासाठी उतरताना उतरणीशी निकराची अशी झुंजच द्यावी लागते. पहिली उतरण शिडी असल्याने उतरता येते, पुढे थोडे सपाट चालून छोट्या भुयारानंतर अतिशय कठीण अशी उतरण आहे. मला वाटतं फक्त या अतिधोक्याच्या उतरणीमुळे बर्याच जणांना झुंजार माचीवर जाण्याच्या आनंदाला मुकावं लागत असणार. संवर्धनाच्या कामात ह्या वाटेचे जर काम झाले तर आणखी बरे होईल. माचीच्या डाव्या तटबंदीने आम्ही बुरुजावर पोहोचलो. या बुरुजावरून डावीकडचा कानंद नदीचा आणि उजवीकडचा राजगडाकडे जाणाऱ्या डोंगररांगेचा प्रदेश दिसतो. थोडा वेळ बसून अभिने त्याच्या भक्कम आवाजात "गारद" दिली. गारदेतला एकेक शब्द ऐकून शहारून येत होतं. या माचीच्या बुरुजाला एक छोटा बुरुज आहे, तो पाहण्यासाठी आपल्याला बुरुजावरून खाली उतरून जावं लागत. झुंजार माचीच्या दोन्ही बाजूच्या तटबंदीच्या मधोमध पहारेकाऱयांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाण्याचे टाके आहे. तटबंदीला दोन्ही बाजूला खाली उतरण्यासाठी छोटे दरवाजे आहेत. तटबंदीतली शौचकुपाची रचना देखील इथे पहायला मिळते. तटबंदी अजूनही भक्कम आहे. या माचीवरून दूरवर बुधला माची दिसते. आणि ते पाहून मग मात्र मन तिकडे ओढ घेऊ लागत. झुंजार माचीवर केलेली येतानाची कसरत परत वर जाताना सोपी वाटली. उतरताना खोली दिसत असते त्यामुळं भीती वाटणं साहजिकच, पण परत चढताना खोली दिसत नसल्याने भीतीचे काही वाटत नाही. पुन्हा ध्वजस्तंभापाशी येऊन तसेच डाव्या बाजूने आम्ही बुद्धाला माचीकडे तटबंदीवरूनच चालत निघालो.

जाताना उजव्या हाताला सदरेची जागा, जीर्णोद्धार झालेली नवी इमारत दिसते. पुढे गडाखालून बांधकामाचे घडीव दगड आणलेले दिसले. जे रोप वे च्या साहाय्याने वर आणले जातात. तिथेच आम्हाला काही युवक काहीतरी गोळा करताना दिसले. विचारपूस केली असता, आम्ही पुण्यावरून आलोय आणि आम्ही सुट्टीच्या दिवशी गड किल्ल्यावर फिरून इथे पडलेला कचरा गोळा करत असतो, असे त्यांनी सांगितले. थोडा वेळ त्यांच्याशी बोलून त्यांचं कौतुक करून आम्ही जय शिवराय बोलून त्यांचा निरोप घेतला. खूप छान वाटलं त्यांना भेटून. तिथून पुढे निघाल्यावर आपल्याला दिसते ते पाण्याचे महार टाके.

महार टाके

गडावर पाण्याची लहान मोठी बरीच टाकी आहेत त्यापैकी एक महार टाके. यातले पाणी अगदी नितळ दिसत होते. पण त्यात शेवाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्याला हिरव्या रंगाची छटा दिसत होती. येथील खडकाला कोरीव खोदकाम करून हे टाके बनविले असावे असे त्याची एकंदरीत रचना पाहून अंदाज बांधता येतो.

महार टाक्याच्या वरच्या बाजूला आई मेंगाई देवीचे मंदिर आहे पण बुधला माचीवर जाऊन आल्यावरच  मंदिर पहायचे असे आम्ही ठरवले आणि आम्ही कोंकण दरवाजाकडे निघालो.

कोकण दरवाजा

हा दरवाजा गडावरील सर्वात प्रशस्थ आणि सुंदर असा दरवाजा. या दरवाजाच्या बुरुजावरील चौथरा खूप मोठा आहे. या दरवाजाच्या बुरुजावरून समोर हत्ती नाळ आणि त्यापलीकडचा बुधला माचीपर्यंतचा सगळा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या दरवाजाची रचनाही गोमुखी आकाराची होती म्हणजेच याला गडाच्या स्वरंक्षणाच्या दृष्टीने खूप महत्व असावे. या दरवाजापाशी एक आजी पाण्याच्या बाटल्या आणि काही खाद्यपदार्थ विकायला बसलेल्या दिसल्या. सहज चौकशी केली तर त्यांनी सांगितले कि आम्ही तर दररोज गड चढून येतो. हे ऐकून मी त्यांना त्यांचं वय विचारलं तर " आमचं वय व्हय, हाय ७०-७५." मला तर अचंबाच वाटला. आणि विशेष म्हणजे त्या दररोज बुधला माचीकडच्या रडतोंडी बुरुजावरून येतात. हा बुरुज म्हणजे भले भले या बुरुजावरून चढून येताना रडकुंडीला येतात म्हणूनच याच नाव रडतोंडी बुरुज ठेवलं असावं.

हत्ती नाळ

या बुरुजाला हत्ती नाळ का म्हणत असावेत हे बुरुजावर असताना तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी तुम्हाला हा बुरुज उतरून बुधला माचीकडे चालत जाताना माघारी जाताना मागे परत वळून पाहावे लागेल. एक अजस्त्र हत्ती तुमच्या समोर उभा असल्याचा भास तुम्हाला होतो. हत्तीसारख्या आकाराचा दिसत असल्याने त्याला हत्ती नाळ असं म्हणत असावेत.
पुढे 
बुधला माचीकडे जाताना एका अवघड कड्याच्या बाजूने जावे लागते. एकीकडे उंच भलामोठा खडक आणि दुसरीकडे खोल दरी असा हा भाग. आमच्यातला एक जण त्यामुळे पुढे आलाच नाही. तुम्ही जाऊन या, मी थांबतो इथे असं तो म्हटल्यावर त्याच्याकडे आमच्या सॅक ठेवून आम्ही मोकळ्या अंगाने पुढे झपझप पावले टाकत निघालो. पुढे डाव्या बाजूच्या बुरुजाशेजारी पाण्याचे टाके लागते तिथे काहीजण न्याहारी करत होते. ते पाहून मात्र भुकेची जाणीव तीव्र व्हायला लागली. पण माघारी जाऊन मेंगाई देवीच्या दर्शनानंतरच जेवायचं असं ठरवून आम्ही पुढे निघालो. बुधला माचीवरचा शेवटचा बुरुज सुस्थितीत नाही. त्यामानाने रडतोंडी बुरुज उत्तम स्थितीत आहे. इथून तुम्हाला राजगड कडे जाणारा डोंगररांगेवरचा पायवाटेचा रस्ता दिसतो आणि समोर राजगडही. या बुरुजावरून उजव्या बाजूला वळून पुढे चिलखत बुरुज, चित्त दरवाजा, वकंजाई दरवाजा, चिणला दरवाजा करत तुम्ही परत हत्ती नाळेपर्यंत गेल्या मार्गाने परत येता. पावासाळ्यात या माचीवर जाणे धोक्याचे असावे, कारण रस्ता पाण्याने घसरडा होत असावा असा अंदाज बांधता येतो.

मागेच थांबलेल्या मित्रापाशी आम्ही परत पोहोचलो आणि पाणी पिऊन, बिस्कीट खाऊन आम्ही परत कोंकण दरवाजाकडे निघालो. दरवाजा चढून वर आल्यावर पुढे मंदिर दिसले आणि हायसं वाटलं कारण सकाळपासून आम्ही फक्त नाष्ट्यावरच होतो आणि आता संध्याकाळचे ५ वाजायला आले होते. मेंगाई देवी मंदिराच्या समोर महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्यासमोर दोन चार सतीशिळा आहेत. पण तेथे फलक वगैरे नसल्याने कुणाच्या हे कळू शकले 
नाही. बूट काढून मेंगाई देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराबाहेरच्या ओट्यावर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. मुक्कामी यायचं झाल्यास इथे मंदिरात १५-२० लोक राहू शकतील एव्हडी जागा आहे. सगळे डबे मोकळे करून जरा वेळ तिथेच लवंडून जरासा आराम केला. एव्हडं छान वाटत होत कि माघारी फिरायची इच्छाच होत न्हवती. तरीही जड पावलाने आणि जड अंतःकरणाने सगळं साहित्य घेऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. पहिला टप्पा उतरून आल्यावर माघारी पाहून परत एकदा गड डोळ्यात साठवून घेतला, परत भेटीला यायचं गडाला वचन दिलं आणि आम्ही माघारी फिरलो.


https://www.youtube.com/watch?v=6bhHxW6WNNY

Saturday, 4 May 2019

माझा बा



" भाऊ "

सकाळपासून वडिलदिनाच्या पोस्टी पाहिल्या आणि नकळत १२ वर्ष जुन्या आठवणिंचे ढग दाटून आले. भाऊ, असं तुमचं अकाली जाणं आमच्यासाठी खूप दुःखदायी होत. बाप काय चीज असते, ते आज स्वतः बाप झाल्यावर कळतंय. मला अजूनही वाटतं कि बिनधास्त जगावं, उनाड जगावं, आयुष्यातले निर्णय बेदरकारपणे घ्यावेत, पण नाही घेऊ शकत कारण मला माहितीये मी बिनधास्त जगल्याने, मी उनाड वागल्याने, बेदरकारपणे निर्णय घेण्याने येणाऱ्या अडचणीला उत्तर द्यायला- ते सांभाळून घ्यायला "बाप" नाहीये.


भाऊ बघाना तुमच्या पोराने तुम्हाला हवं होत तसं सिमेंट काँक्रेटचं घर बांधलय, दुचाकी घेतलीये, घर सांभाळलंय, बहिणीचं लग्न लावून दिलंय, तुम्हाला स्वतःच्या चारचाकीत बसायचं होतं तेही होईल. सगळं काही सुरळीत चालूये भाऊ, आता तरी याल का?
या, याना तुमचा नातू तुमची वाट पाहतोय, तुमचा पोरगा तुमची वाट पाहतोय, तुमची बायको, तिचं तर काही विचारूच नका. या, आपल्या बंगल्यात राहायला, या, तुम्हाला मस्त आपल्या दुचाकीवरून दूरवर फिरवून आणतो,


मला ना तुमच्या बरोबर सेल्फी पण काढायचाय, सगळ्या पोरा-पोरींनी आपापल्या बापासोबत काढलेला फोटो बघून गहिवरायला होतय भाऊ.


एक वर्षी ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरला निघाली तेव्हा तुम्ही म्हणाला होतात कि, श्रावणबाळासारखं तू पण आम्हाला कावडीत बसवून पंढरपूर ला नेशील का? आज मी म्हणेन हो नेतो, आता तुमचे दोन दोन वाघ तैय्यार झालेत, आता तरी या. बरेच दिवस झालं मी काढलेल्या चित्रांचं तुमच्या सारखं कौतुक कुणी केलंच नाहीये, तेव्हड करायला तरी या. मला माहितीये तुम्ही नाही येणार ते. कारण तुम्ही गेला नाहीयेत तुम्हाला देवाने नेलंय, आमच्यापासून दूर. मग वडील दिनाच्या शुभेछया देऊ तर कुणाला?


तुम्ही गेल्यानंतर ती जबाबदारी ज्या माय माउलीने लीलया पेलली तिलाच आज माझ्याकडून "वडीलदिनाच्या खूप खूप शुभेच्छा".


बऱ्याचदा बघितलंय माझे मित्र त्यांच्या वडीलांवर चिडताना, खेकसताना. त्यांना वडिलांची किंमत नाहीये, असं मी म्हणणार नाही. पण नका रे असं वागूत. बरंच काही सहन केलेलं असतं त्यांनी आपल्यासाठी आणि करतही असतात.


तुम्ही जे बिनधास्त जगताना ते फक्त बापाच्याच जीवावर, मग तो बाप अंथरुणावर आजाराने खिळलेला असला तरीही. त्यांना प्रेम द्या, त्यांची स्वप्न पुरी कशी करता येतील यासाठी झटा. बघा आयुष्य किती सुखाने भरून जाईन. कधीतरी प्रेमाने त्यांच्याशी बोला. त्यांनीच घेऊन दिलेल्या मोबाईल मध्ये त्यांच्या सोबत एखादा सेल्फी काढा बघा बाप काय खूष होतो ते. याच्या पलीकडे आनंदाची व्याख्या ती काय. हे एक बापच तुम्हाला सांगतोय.
आपलाच,
किशोर पवार

Thursday, 14 March 2019

मेंदवाचं कष्ट


" मेंदवाचं कष्ट "




"दादू, तू आपला मेंदवाच कष्ट घे, शारीरिक कष्ट तुझ्याच्याने नाय व्हनार." काल ज्वारी काढताना आमच्या आई साहेबांचे उदगार. खरंय तिचं ती लहानपणापासून नेहमी मला सांगत आली कि, आमचे दिवस मातीतच गेले तुमचे जाऊ देवू नका आणि म्हणून शाळा शिका. हा जीव तोडून सांगितलेला सल्ला ऐकत आलो आणि आज त्या शिक्षणाच्या जोरावर स्थिर स्थावर हि झालो. काल ज्वारी काढून थोडा वेळ सावलीत बसलो तेव्हा हाताकडे पाहिलं, काळे पडलेले. चेहऱ्याला ज्वारीच्या ताटांचा लागलेला काळा रंग आणि लाल झालेले हात पाहून मनात असंख्य विचार तरळून गेले. एक दिवस काम केल्याने आपल्या हाताची हि अवस्था तर मग सबंध आयुष्यभर न चुकता, कसलही कारण न सांगता, कसलीही सुट्टी न घेता, दररोज काम करणाऱ्या त्या तमाम शेतकऱ्यांचे हात कसे दिसत असतील. किती हाल सोसत असतील हा विचार करून घाबरायलाच झालं. 






काल सहज उत्सुकतेपोटी बर्याच जणांचे हातही पाहिले. आणि मग कळालं कष्ट काय प्रकार आहे आणि शेती करणं किती अवघड. रात्री झोपताना आईचेहि हात हातात घेऊन पाहिले, भेगांनी भरूनही मायेचा मऊदार पणा मला जाणवला, त्या हातांवर माझे ओठ टेकले आणि खळकन आईच्या डोळ्यात पाणी तरळले. आईला बोललो ह्या तुझ्या झिजलेल्या हातांच्या कष्टाचं चीज करणार हा तुझा लेक.

पायाला पडलेल्या भेगा म्हणजे आयुष्यभराच्या कष्टाच्या खुणा स्पष्टपणे हाताला खरबरीत जाणवल्या. मग त्या भेगांना तेल लावून थोडंसं मऊ करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना माय माऊली कधी निजली मला कळलंच नाही.


 "आमचं कल्चर ऍग्रीकल्चर" म्हणणं खूप सोपं आहे, पण ते जगणं खूप अवघड. कित्येक लोक असे आहेत ज्यांचे हात कधी मातीला लागत नाहीत आणि कित्येक लोकांचे हात मातीतून कधी निघतच नाहीत.


वाचकांनो एक नम्र विनंती, तुमच्या घरात जर कोणी शेती करीत असेन, तर तुम्ही शिकलेले, सुशिक्षित म्हणून त्यांच्या पुढं फुशारक्या मारू नका, एकदा फक्त त्यांचा हात हातात घेऊन त्याचं प्रेमभरे चुंबन करा, त्यांना कृतकृत्य झाल्यासारख वाटेल. आणि ह्या आनंदासारखा दुसरा आनंद जगात कुठलाच नाही. एकदा प्रयत्न करून तर बघा.





Thursday, 31 January 2019

१२ महिने २४ किल्ले ___ किल्ले-गडमाला वर्षभरातली

Torna Killa




 " १२ महिने २४ किल्ले "
किल्ले-गडमाला वर्षभरातली


"
एकंदरीत २०१९ हे वर्ष एकदम भन्नाट जाणारे असंच दिसतंय. कारण आता भरपूर फिरायचंय असा चंगच मनी बांधलाय. आभासी दुनियेतून बाहेर येऊन खर्याखुर्या दुनियेत फिरायचंय. कारण फिरल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतात. आपण प्रगल्भ बनत असतो आणि हो नेमकं तेच बनायचंय. पण नक्की कुठे फिरायचं, नक्की काय बघायचं हे अगोदरच नियोजित असणं गरजेचं वाटलं. त्यादृष्टीने विचार सुरु झाले, आणि त्याची ही भली मोट्ठी यादीच तयार झाली.
"



तसा मला इतिहास-भूगोलात जरा जास्तच रस आहे. शाळेत असताना त्या विषयात मिळालेल्या गुणांवरून तरी मला तसेच वाटायचे. हीच गोडी मी आजपावेतो जपत आलोय आणि 
शाळाबाह्य इतिहास पण वाचत आलोय. त्यात प्रामुख्याने "राजा शिव छत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याचा इतिहास" मला जास्त ओजस्वी आणि तेजस्वी वाटतो. कल्पनेतलं विश्व साकारणं आणि ते तसंच टिकवणं यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. यात शिवबांना बहुत जनांची साथ लाभली. त्यात अनेक शूरवीर मावळे, सरदार आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे रांगडा सह्याद्री हे होत.

सह्याद्रीच्या जोरावरच किंवा त्याच्या साथीनेच शिवबा हे स्वराज्यस्वप्न साकार करू शकले. आणि त्याच साकाराचा एकमेव साक्षीदार म्हणून तो अजूनही हयात आहे आणि राहील. हा सह्याद्री स्वराज्यस्थापनेच्या काळातल्या अनेक आठवणी आपल्या उदरात घेऊन त्या जपण्याचं काम करतोय. आणि हो एकदा का माझी त्याच्याशी जवळीक, आपुलकी झाली, कि तो या आठवणी मला सुद्धा सांगेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणूनच मी या वर्षात सह्याद्रीशी जवळीक करणार आहे.

सह्याद्रीत असलेल्या गड किल्ल्यांना भेट देणार आहे. गडाच्या प्रत्येक शिळेत त्याकाळी घडलेल्या संवादाचे नाद ध्वनी अजूनही घुमत आहेत ते मी ऐकणार आहे. आणि ह्याच अनुभवलेल्या गोष्टी मी ह्या लेखमालेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे. ज्याचं शीर्षक आहे "१२ महिने २४ किल्ले". चला तर मग सुरु करूया हि सह्याद्री सफर माझ्या लेखमालेच्या माध्यमातून .

लिखित ब्लॉगला जोड म्हणून मी व्हिडीओ ब्लॉग सुद्धा बनवणार आहे, ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून माझ्या Youtube Channel ला Subscribe करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन मिळतील, आणि तुम्ही ते पाहू शकाल. 


https://www.youtube.com/channel/UCa8XZ51o53nDSRIJHhSsolw/featured?view_as=subscriber

२०१९ मध्ये येणाऱ्या १२ महिन्यातले २४ किल्ले कोणते? याचे वेळापत्रक मी लवकरच तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून देईनच. त्यासाठी माझ्या ह्या ब्लॉगला सुद्धा subscribe करा. म्हणजे वेळोवेळीचे अपडेट तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून मिळत राहतील. ब्लॉग कसा वाटतो याबद्दल बिनधास्त बोलत चला आणि तुमच्या मित्रांशी पण share करा.

तूर्तास एव्हढेच!

आता भेटूया गडमालेतल्या पहिल्या गडावर.

" तोरणा एक प्रचंडगड --- गरुडाचे घरटेच जणू " 
धन्यवाद.


किशोर पवार
९१५६७२०८७८ 

pawarkishorart3@gmail.com

_____________________________________________________________________________

Friday, 18 January 2019

" प्रतापगड " .. पुण्यातही...?

" प्रतापगड " ..  पुण्यातही...? 


  

सकाळी सकाळी मावसबंधूंचा फोन आला. त्यांनी फोनवर मला सांगितलं, अरे प्रतापगड पुण्यात आलाय. मी जरा प्रश्नार्थक नजरेने विचारलं, कसं शक्यय? पुण्यात यायला. मला काही कळेचना. तरीही आपल्या वाक्यावर ठाम रहात त्यांनी परत त्यांच्याच वाक्याला दुजोरा देत म्हटले, “अरे हो, खरंच प्रतापगड पुण्यात आलाय.” तुला पहायचाय का? आता बाकी उत्सुकता वाढू लागली आणि मी लगेच होकार दिला. मग त्यांनी मला ठिकाण आणि ज्या अवलियाने प्रतापगड पुण्यात आणलाय त्यांचा नंबर दिला. रविवारी मी प्रतापगड पाहायला नक्की जाणार असा शब्द देऊन मी फोन ठेवला. 


        मात्र फोन ठेवल्याबरोबरच विचारचक्र सुरु झालं आणि मन थोडं इतिहासात डोकावू लागलं. “भोरप्या डोंगर” जो ‘मोरोपंत पिंगळे’ आणि ‘हिरोजी इंदलकर’ या शिवरायांच्या प्रधानांनी अवघ्या दोन वर्षात बांधून जावळीच्या खोर्यावर पहारेकरीच उभा केला आणि याच प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून मोठा प्रताप केला आणि भोरप्याचा "प्रतापगड" झाला. बंधूंनी सांगितलेला नक्की काय प्रकार आहे, हे जाणून घेण्यासाठी माझं मन हैराण होऊ लागलं. रविवारची वाट मी अगदी उत्कंठतेने पाहू लागलो. आणि अखेर तो दिवस आला. रविवारी दुपारपर्यंतचं एक काम उरकून मग त्या ठिकाणी जायचं असं ठरलं. सोबत राहुल हि असणार होता. दुपारी २ वाजता काम उरकून आम्ही त्याठिकाणाकडे जायला निघालो. दुचाकीमूळे  आम्हाला गाड्या बदलत जावे लागणार न्हवते. हिवाळ्याचे दिवस असल्याने भरदुपार असूनही ऊन काही जाणवलं नाही. सांगवीमधून प्रथम वाकड आणि मग पुढे माण रोड वरून ठरलेल्या नियोजित ठिकाणी आम्ही जाणार होतो. सुट्टीचा दिवस असूनही रस्त्याला गर्दी एव्हडी विशेष जाणवली नाही. वाकड उड्डाणपूल पार करून फेज १ च्या एकतर्फी रस्त्याने आम्ही माण रोडला पोहोचलो, उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. फेज १ पासून साधारण ५ मिनिटांच्या अंतरावर, उजव्या हाताला आम्हाला भगवं निशाण फडकताना दिसलं आणि आपण एव्हड्या कमी वेळात इथवर पोहोचल्याच्या विचाराने जीव भांड्यात पडला. जसे-जसे जवळ जाईल तसे तसे जाणवायला लागले आज जे काही आपण पाहणार आहोत हे अद्भुत असणार आहे. रस्त्यालगतच २.५ एकर क्षेत्रामध्ये हे सगळं उभं दिसत होतं. सुरुवातीलाच भव्य असं प्रवेशद्वार आणि त्याच्या दोहो बाजूला मांडलेल्या दोन तोफा आमच्या स्वागतासाठी उभ्या असल्यासारख्या भासल्या.









कमानीतून पुढे आत गेल्यावर समोर जे काही दिसलं ते अगदी अदभूत होत. खरंच हो, समोर “प्रतापगड” होता. आणि तोही डोळ्याचे पारणे फेडण्याएव्हढा भव्य. पटांगणाच्या उजव्या बाजूला गाडी पार्क करून, ज्याने हे सगळं बनवलंय त्या अवलियाच्या तिथेच असलेल्या निवासाकडे आम्ही वळलो. तिथे काही लोक आपल्या कामात व्यस्त होती. आम्ही जवळ जाऊन धनंजय बर्वे आहेत का? असं विचारताच होकारार्थी मान डोलावत त्यांच्यामधून एक माध्यम उंचीचा माणूस पुढे आला. हो मीच धनंजय बर्वे. आम्ही आमचा परिचय सांगून माझ्या मावसबंधूंचं नाव सांगितलं, तशी आनंदाची एक लकेर त्यांच्या चेहर्यावर मला जाणवली. बहुदा माझ्या बंधूंनी माझी ओळख त्यांना फोनवरच करून दिलेली असावी, असे वाटून गेले. प्रथम तर आम्ही या संकल्पनेविषयी त्यांच्याशी चर्चा केली. सर्व काही सांगतानाचा या माणसाचा उत्साह जबरदस्त होता. सुचलेली कल्पना आणि सत्यात उतरलेला किल्ला इथपर्यंतचा सर्व प्रवास त्यांनी आमच्यासमोर मांडला. मदत करणारांची नावे ते अगदी भारावून सांगत होते. स्वतःच घर नसलेला माणूस हे असलं मोठं धाडस करतो, याला वाघाचंच काळीज असावं लागतं. शिवविचाराने प्रभावित झालेला माणूस काय करू शकतो याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धनंजय बर्वे". भौतिक सुखाच्या मागे वेड्यागत धावत सुटलेल्या माणसांना इतिहासात, गड किल्ल्यात रस राहिलाय कुठे, वेळेअभावी नाही जाता येत किल्ल्यांवर म्हणून मी किल्ला त्यांच्याकडे घेऊन आलोय." या एका वाक्याने या संकल्पनेमागची कारणमीमांसाच स्पष्ट झाली. तासभर त्यांच्याशी गप्पा मारल्यावर आम्ही आता प्रतापगड पाहायला जाऊया, असं ठरवून त्या भव्य कलाकृतीकडे निघालो. तर बर्वे सुद्धा आमच्यासोबत गड दाखवण्यासाठी म्हणून मोठ्या उत्साहाने आमच्यासोबत निघाले.


सुरुवातीलाच छोटेखानी तिकीट घर आहे, तिथे बर्वेंच्या आई बसल्या होत्या. बर्वेंनी यांचे तिकीट घेऊ नको असे त्यांना सांगितलं, पण मलाच ते बरं वाटणार नसल्याने मी स्वतः १०० रुपये काउंटरवर ठेवून दोन तिकिटे घेतली. तिकीटघरापासून पुढे छोटीशी कमान आहे. त्या कमानीतून आत गेल्यावर किल्ला नजरेत येतो. मूळच्या प्रतापगडाच्या बालेकिल्ल्याच्या खाली जशी गाड्या पार्क करण्यासाठी जागा आहे, तशीच इथेही आहे. त्यामुळे आपण मूळच्या प्रतापगडीच आहोत कि काय असे वाटते. प्रतिकृतीसमोर मात्र आपण स्वतः खुजे दिसू लागतो एव्हढी ती भव्य आहे. बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजूने पुढे चालत गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या पायर्या लागतात. पायऱयांवर पाय ठेवताना त्यांच्या मजबूतीविषयी थोडा साशंक होतो, पण बर्वेंनी पुढे होऊन त्यावर अक्षरश: उड्या मारून दाखवल्या. मग मात्र आमची खात्री पटली आणि आम्हीही पायऱ्या चढायला सुरुवात केली. समोर महादरवाजा दिसू लागला अगदी हुबेहूब रचना केलेला. दरवाजाच्या आतमध्ये पहारेकऱयांसाठीच्या जागा आहेत. त्याला "देवड्या" असं म्हणतात. यात एका बाजूला अफजलखानाच्या वधाचे तर दुसऱ्या बाजूला राज्याभिषेकाचे सुंदर चित्र लावलेले आहे. प्रवेश करून समोर पाहिल्यावर टेहळणी बुरुज दिसतो. आणि एकंदरीत आपण प्रतापगडी असल्यासारखाच भास होतो. बुरुजावरील फडकत्या भगव्याकडे पाहून तर स्फुरणंच चढते. बुरुजाला शस्त्रूवर हल्ला चढवण्यासाठीच्या घळई सुद्धा दाखवल्या आहेत. पुढे चालत जाऊन आम्ही टेहळणी बुरुजावर पायऱयांनी चढलो. बुरुजावर सहज गोलाकृती फिरता येईल एव्हढी जागा आहे. बुरुजावरून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. आणि दूर असलेली शिवरायांची अश्वारूढ मूर्ती नजरेस पडते. आणि पाय तिकडे ओढ घेऊ लागतात.
 या ब्लॉग ला तुम्ही व्हिडीओ स्वरूपात पण पाहू शकता



टेहळणी बुरुजाला संरक्षण म्हणून छोट्या संरक्षक बुरुजाची रचना जशी प्रतापगडी आहे अगदी तशीच इथेही आहे. एक माणूस त्यातून आरामशीर फिरू शकेल एव्हढी जागा आहे. त्या छोट्या बुरुजाने मोठ्या बुरुजाला वळसा घालत आम्ही पुन्हा दरवाजाकडे जाणार तेव्हड्यात तिथे बुरुजाला खिडकीसारखी रचना असलेली जागा मला दिसली. ती नक्की कशासाठी असावी? याचा मी विचार करायला लागलो, पण काही अंदाज बांधता येईना. न राहावून शेवटी बर्वेंना मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी आम्हाला सांगितले कि, पूर्वी गडावर शौचकूप असायचे त्याची हि रचना इथे केली आहे. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बर्वेंनी इथे साकारल्या आहेत. तिथून पुढे निघून समोर आम्हाला दोन रस्ते दोन बाजूला जाताना दिसले पण दिशादर्शक फलक असल्याने आमचा गोंधळ उडाला नाही फलकावर दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही पुढे निघालो. डाव्या बाजूने आम्ही आता वर भवानी मातेच्या मंदिराकडे जाणार होतो. वर मंदीर आहे समजताच आम्ही आमच्या चपला तिथेच काढून पुढे पायऱ्या चढायला सुरुवात केल्या. मोठाल्या ८-१० पायऱ्या चढल्यावर डाव्या बाजूला आई भवानी मातेचं मंदिर दिसलं. आणि गंडकी नदीतील पाषाणापासून बनवलेली प्रतापगडावरची मूळ भवानीआईची मूर्ती समोर दिसायला लागली अगदी हुबेहूब. आई समोर माथा टेकून "कलाकाराच्या हाताला यश दे", असं मागणं मागून मी उभा राहिलो. राहुलनेही आई भवानीमातेचे दर्शन घेतले. तिथून डावीकडे पाहिल्यावर सपाट भूभाग बनवल्यासारखा दिसला. माझी उत्सुक नजर बर्वेंनी बरोबर हेरली आणि ते सांगू लागले, कि इकडे पुढे शंकराचे मंदीर मूळ प्रतापगडी आहे. पण जागेअभावी आपल्याला ते करता नाही आले. तरीही थोडीशी शक्कल लढवून जागेच्या प्रश्नावर मात करत ते आपण बनवलंय. कुठे? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यासाठी आपल्याला गड उतरून खाली जावे लागेल असे सांगितले. पण त्याआधी उरलेला गड पाहण्यासाठी आम्ही उजव्या बाजूने पुढे निघालो.












पुढे गडाचे मुख्य आकर्षण असणार होते ते म्हणजे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा. थोडे पुढे गेल्यावर चौथर्यावर उभा केलेला पुतळा आम्हास दिसला. आम्हा तिघांकडूनही राजेंना मुजरा घातला गेला. राजांची ती मूर्ती पाहून अंगभर रोमांचच उभे राहिले. बराच वेळ तिजकडे पाहिल्यावर आम्ही माघारी फिरलो. नुकताच सूर्य मावळतीकडे झुकलेला दिसला. उंच ठिकाणी असल्याने सूर्य आणि आमच्या मध्ये बुरुजावरील भगवा येत होता. सूर्यापुढे त्याचे तेज तसूभरही कमी होत न्हवते. आणि म्हणूनच कि काय, सूर्यानेही आता आकाशात भगव्या रंगाची उधळण केली होती. हे सगळं दृश्य आणि वातावरण पाहून मन अगदी भारावून गेलं. तिथूनच सर्व गड पुन्हा एकदा नजरेत सामावून घेतला आणि पुन्हा चपला घालून आम्ही गड उतरायला लागलो.

गडाच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर लागलीच उजव्या बाजूला जागेच्या प्रश्नावर मात कशी केली हे पहायला मिळणार होतं. तिथे चक्क भुयार बनवलेलं आम्हाला दिसलं. आम्ही वाकून आतमध्ये जायला निघालो. उजेडातून एकदम अंधारात आल्यामुळे आम्हाला जरा अंधारल्यासारखं झालं, पण काही वेळातच आतमध्ये असलेल्या प्रकाशदिव्याच्या मंद उजेडाने सर्व काही दिसू लागलं. थोडं पुढं गेल्यावर भुयाराच्या भिंतीला एका हाताच्या पंजाएव्हढे छिद्र दिसले. त्यातून आत पाहिलं तर शंभू महादेवाची पिंड आणि त्यावर पहारा देणारे नागराज नजरेस पडले. त्यावर वेगवेगळ्या रंगाचे दिवे रंगांची उधळण करत असल्याने त्या नजाऱ्याला एक भलतीच रंगत आली होती. तिथून पुढे आतमध्ये महालक्ष्मी देवीचीही मंदिर अगदी तसेच दाखवले होते. जागेचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसत होता. चालताना किल्ल्याच्या बांधणीसाठी रचलेले लोखंडी पाईप पायात येत होते. त्यामुळे खालीही लक्ष ठेवावं लागत होत. पुढे काही ठिकाणी, शिवरायांच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या प्रसंगांची चित्रे लावली होती. ते पाहून आम्ही अगदी इतिहासात रमून गेलो होतो. आपसूकच प्रत्येक चित्रावर राहुल आणि माझी चर्चा होत होती. भुयारी मार्गातही लपण्याच्या जागा बनवलेल्या असायच्या त्याचंही प्रात्यक्षिक बर्वेंनी आम्हाला दाखवलं. पाण्यासाठी भिंतींना आडवी छिद्रे कशी केली जायची हेही त्यांनी त्या भुयारात दाखविले आहे. पुढे त्या किल्ल्याची छोटी प्रतिकृती काचेमध्ये ठेवलेली आम्हाला दिसली. आता आम्ही भुयाराच्या शेवटच्या टप्प्यात आलो होतो. तिथे गणपतीचे सुरेख मंदिर बनविलेले दिसले आणि ते पाहून आम्ही हरकूनच गेलो. सुंदर मंदिर रचना, सुंदर प्रकाशरचनेने मंदिर सौन्दर्य खूपच भारी दिसत होते. गडाच्या बुरुजावरील भगव्याच्या बरोबर खाली हि मंदिर रचना केली आहे, असे आम्हाला बर्वेंनी सांगितले. गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलो.




गडाच्या कुंपणावर महाराजांच्या स्वराज्यात असणाऱ्या सर्व किल्ल्यांची माहिती फ्लेक्स फलकांवर छापलेली दिसली. डाव्या बाजूने प्रवेश केलेले आम्ही आता गडाच्या उजव्या बाजूला आलो होतो. आता गडाची प्रदक्षिणाच पूर्ण करूया, असा विचार करून आम्ही प्रदक्षिणेसाठी निघालो. गडाच्या मागच्या बाजूला गेल्यावर पुन्हा एकदा हे काम किती भव्य आहे याची प्रचिती आली. किल्ल्यापुढे आम्ही अगदी इवलेसे दिसू लागलो होतो. किल्ला बनविण्यासाठी तयार केलेली  लोखंडी रचना बर्वेंनी आम्हाला दाखविली. ती पाहून एका वेळी २५० माणसे किल्ल्यावर उभी राहू शकतील, या वाक्याला दुजोराच मिळाला. वळसा पूर्ण करून आम्ही या कलाकृतीच्या सुरुवातीच्या छोट्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलो. तिथे बर्वेंनी आम्हाला त्यांच्या आऊसाहेब, त्यांच्या भगिनी आणि बंधूंना भेटवलं. या करू घातलेल्या शिवकार्यात त्यांचाही मोलाचा सहभाग आणि साथ आहे, हे ऐकून खूप छान वाटलं. बाहेर आल्यावर आम्हाला त्यांनी स्वतः बनवलेली तोफ दाखवली. ज्याने गडावरच्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करता येते. त्याचं प्रात्यक्षिक जरी दाखवू शकत नसले, तरी प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ त्यांनी आम्हाला दाखविला. मग मात्र आमची त्या तोफेबद्दलची खात्री पटली.



" या ठिकाणी येण्यापूर्वी एव्हढं सगळं पाहायला मिळेल असं वाटलंही न्हवतं. पण अपेक्षेपेक्षा खूप काही जास्तच मिळालं. दुपारी ३ वाजता पोहोचलेलो आम्ही संध्याकाळी ७ वाजता तिथून निघालो. निघण्यापूर्वी बर्वेंचे तोंडभर कौतुक केले. त्यांची प्रेमभावनेने गळाभेटही केली. ४ तास किल्ला बघूनही पुनःपुन्हा किल्ल्याकडे लक्ष जात होते. परत एकवार किल्ल्याकडे पाहिले तो डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला, राजेंना आणि भगव्याला मनोमन मुजरा करून आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो. हा लेखप्रपंच वाचणाराला मी एकच आवाहन करिन कि, तुम्हाला मूळ "प्रतापगडी" जायला वेळ मिळत नसेल, तर अगदी पुण्यापासून हाकेच्या अंतरावर सहकुटुंब जाता येईल, आणि भरपेट समाधान मिळेल असे ठिकाण आहे हे. मूळ ठिकाणाचा अनुभव इथे येतोच येतो. आणि ज्याने जीवाचं रान करून हे शिवकार्य उभं केलंय त्यांनाही आपल्या जाण्याने, त्यांचं कौतुक करण्याने, त्यांना प्रेरणा मिळेल आणि हे भव्य शिवकार्य पुढे जात राहील. 

"


तुम्ही जर कात्रज वरून येणार असाल तर वाकड पुलापर्यंत बस किंवा ६ चाकी टमटम मिळेल आणि तिथून पुढे माण गावाकडे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने तुम्हाला इथपर्यंत पोहोचता येईल. 
शिवाजीनगर वरून वाकड ला येण्यासाठी सुद्धा बसेस मिळतात.


खालील लिंक वर क्लीक करून तुम्ही लोकेशन गूगल मॅप मध्ये पण पाहू शकता:
https://earth.google.com/web/@18.58145114,73.724793,572.30298267a,246.2867237d,35y,31.7884886h,0.52726409t,0r?fbclid=IwAR0rFCSw0rWB95jt304wrXhvQ1yS6cqJ6HqdWOjteTsw62sAf6xRkbyb3ik


किल्ला बघण्यासाठी लागणारा वेळ :
साधारण १ तास. 

धनंजय बर्वे  यांचा संपर्क क्रमांक
+91 84129 52154

या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि असे आणखी प्रवास प्रसंग अनुभवण्यासाठी ब्लॉगला SUBSCRIBE करायला विसरू नका.





शिवरायांचा एक मावळा 
किशोर पवार 
९१५६७२०८७८

Friday, 7 April 2017

साबण


सकाळचे साधारण ६ वाजले असावेत. नारबाला छान झोप लागली होती. तेव्हड्यात त्याच्या कानावर आईचा आवाज ऐकू येऊ लागला."नारबा ऊठ, आज गुरांकडं तुला यायचंय" आईचा आवाज नारबाला झोपेतून जागा करत, मेंदूच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत गेला.पापण्यांना किलो चे दगड बांधल्यासारखे नारबाला डोळे उघडणे अवघड झाले होते. अर्धे डोळे अगदी कष्टाने उघडून झोपेतच नारबा बोलला, "मी न्हाय येणार बा ला घेऊन जा" "उतरली न्हाय तुझ्या बा ची अजून, तूच चल" नारबाची आई बोलली. 

आता बाकी नारबाला खात्रीच पटली कि, आपल्याला आईसोबत गुरांकडं जावंच लागणार. अंगावरच बाजूला सारत, नारबा आळस देत डोळे चोळत उठला. शेजारीच झोपलेल्या लहान भाऊ आणि बहिणीकडे पाहून नारबाला ते दोघेही त्याच्या पेक्षा लहान असल्याचा खूप राग आला. छान झोपली होती दोघं. नारबा अंथरुणातून बाजूला होईपर्यंत त्याची आई रस्त्याला चालायला लागली होती. नारबाचा गुरांचा गोठा घरापासून दूर अंतरावर होता. नारबाने गाईचं दूध काढून घरी आणण्यासाठी ची उपडी करून ठेवलेली बादली उचलली आणि तसाच पारुश्या चेहर्याने गोठ्याकडे आईपासून ठराविक अंतराने चालायला लागला. गावाकडच्या सकाळच्या लगबगीचे आज नारबाला दर्शन होत होते. सूर्य त्याचा प्रकाश गावावर पांगवायला आसुसल्या सारखा वाटत होता. पक्ष्यांचा किलबीलाट अगदी स्पष्ट एेकु येत होता. सकाळी सकाळी कुत्रे आपापसात एका मागे एक धावून जणू व्यायामच करत होते. आंघोळीचे पाणी तापवणाऱ्या चुली भकाभक दूर सोडत होत्या. रात्रभर डालून ठेवलेल्या कोंबड्यांनी सोडल्या बरोबर इकडे तिकडे पळायला सुरुवात केली होती. त्यातलाच एक कोंबडा अगदी रुबाबदार दिसत होता. तो सारखा बांग देऊन जणू आपलं अधिराज्य गाजवत असल्या सारखा नारबाला भासला. हातातली बादली त्या कोंबड्याच्या दिशेने हवेतल्या हवेत भिरकावून त्याने त्या कोंबड्याला पळवून लावले. आणि विजयश्री नजरेने पुढे चालायला लागला. अंगणातला कचरा झाडून त्यावर पाणी मारत असताना मातीतून निघालेला सुगंध सकाळचे वातावरण अगदी ताजेतवाने करत होता. रस्त्यातच लागणाऱ्या शाळेच्या जवळ आल्यावर काही मुले शाळेच्या व्हरांड्यावर व्यायाम करत असल्याचे नारबाला दिसले. साधारण अंग काठीचा असल्याने नारबाचा आणि व्यायामाचा कधी दूरपर्यंत संबंधच आला न्हवता. त्याला त्या व्यायाम करणाऱ्या मुलांचे नेहमीच कौतुक वाटे. न राहावून त्याने स्वता:चे हात डोक्याकडे घेऊन दंडाची बेडकी किती फुगते याचा अंदाज घेतला. आणि त्या बेडकीकडे पाहून हसत हसत पुढे चालायला लागला. गोठ्यावर पोहोचताच नारबाच्या आईने शेणकुटाचे काम सुरु केले होते. नारबा गोठ्याजवळ पोहोचताच गाईचे सड धुण्यासाठी लागणारे पाणी समोरच्या घराच्या न्हाणीतून आणायला सांगितले. समोरच्या घराची न्हाणी बाहेर होती आणि तिथे पाण्याचा नळ होता. नारबाने आपला मोर्चा नळाकडे वळवला. बादली नळाखाली लावून त्याने नळ चालू केला, आज नळाला पाणी जरा कमी जोरानेच चालू होते. नारबा न्हाणीत इकडे तिकडे पाहू लागला न्हाणीत काही पाण्यासाठीची भांडी होती, आंघोळ केलेल्यांनि धुवायला टाकलेले कपडे होते आणि थोड्या उंचीवर भिंतीत बसवलेल्या फरशीच्या तुकड्यावर एक अंगाचा साबण ठेवलेला नारबाला दिसला. त्याने तो उचलून त्याचा वास घेऊन पाहिला खूपच सुवासिक होता तो. त्याने तो परत ठेवला आणि बादलीकडे पाहायला लागला. दररोज कपड्याच्या साबणाने अंघोळ करणाऱ्या नारबाच्या नाकातून त्या सुवासिक साबणाचा वास काही  नीघता निघेना. आपणही अशा साबणांने अंघोळ करावी असे त्याला मनोमन वाटू लागले. पण असा साबण आपल्याला घरी मिळणार नाही याची त्याला खात्री होती. सुवासिक साबणाने आंघोळीच्या कल्पनेने त्याला राहवेना. काहीही करून आपण आज सुवासिक साबणाने अंघोळ करायचीच असे त्याने ठरविले. इकडे तिकडे पाहून कुणी आपल्याकडे पाहत तर नाही ना याचा त्याने अंदाज घेतला. कुणी पाहत नाहीये याची खात्री झाल्यावर त्याने तो साबण उचलला आणि आपल्या विजारीच्या खिशात टाकला. आता त्याला न्हाणीतून बाहेर पडायची घाई करावी लागणार होती. नळ बंद केला आणि पाण्याने अर्धीच भरलेली बादली त्याने उचलली आणि परत गोठ्याकडे घाबरत घाबरत आला. नारबा पाणी घेऊन येईपर्यंत त्याच्या आईने शेण एका टोपली मध्ये भरून ठेवले होते. नारबाच्या डोक्यावर ती टोपली त्याच्या आईने उचलून दिली आणि उकिरड्यावर टाकून यायला सांगितले. एका हाताने टोपली पकडत नारबा उकिरड्याच्या दिशेने चालायला लागला, शेणाची टोपली मोडकळीस आलेली असल्याने त्यातला कोरडा कचरा डोक्यात आणि खांद्यावर सांडून शर्ट च्या आतमध्ये अंगाला लागत होता. पण आज सुवासिक साबणाने अंघोळ करायला मिळणार या एका कल्पनेनेच त्याचे लक्ष कशातच न्हवते. कचरा टाकून आल्यावर नारबा हात स्वच्छ धुवून आईसोबत गाईची धार काढायला बसला. नारबाने एक तांब्या दुधाचा काढेपर्यंत त्याच्या आईने दूधाचे चार तांबे काढले, ह्या आईच्या लकबीच नारबाला नेहमी कौतुक वाटे. धार काढून झाल्यावर गुरांना कडबा त्यांच्या दावणीत टाकून, दोघं मायलेकरे घराकडे निघाली. झपाझप पावले टाकत नारबा घराकडे निघाला. आज सुवासिक साबणाने अंघोळ म्हणजे त्याच्यासाठी आनंदाची पर्वणीच होणार होती. घरी नारबाचे वडील अजूनही झोपलेलेच होते. लहान भाऊ बहीण मात्र उठून आवराआवरी करीत होते.


घरी पोहोचताच नारबाने फर्मानच सोडले कि, "मी गुरांकडं आलो व्हतो, आता डेरीवर दूध घालायला मी जाणार न्हाय." आईनेही ते कबुल करून नारबाचा छोटा भाऊ पांडूला दूध घालायला जायला सांगितले. नारबाच्या घराची न्हाणी घरातुन बाहेर होती. नारबाला माहीत होते, पांडू दूध घालायला गेला रे गेला कि, आई स्वैपाकासाठी घरात जाईन, लहान बहीण आईला मदत करायला आतमध्ये जाईल, म्हणजे पांडू माघारी येईपर्यंत त्याला सुवासिक साबणाने मनसोक्त आंघोळ करता येणार होती. घराबाहेरच्या चुलीवर गरम करायला ठेवलेलं पाण्याचं पातेलं नारबाने उचलून न्हाणीत आणलं. नारबाची न्हाणी इतकी प्रशस्थ होती कि, आंघोळ करताना दोन्ही हात कोपरात दुमडून बोटे खांद्यावर टेकवून जर हात सरळ रेषेत वर उचलले तर, दोन्ही कोपऱ्यांना न्हाणीच्या भिंती लागत एव्हडी प्रशस्थ.




त्याने हवे तेव्हडे थंड पाणी गरम पाण्यात मिसळून अंगावर घेता येईल असे बनवले. आणि विजारीच्या खिशातून मघाशी घेतलेला साबण त्याने बाहेर काढला. कपड़े काढून तयार झाला आणि आंघोळीला त्याने सुरुवात केली. अगदी नखशिखांत, आणि सोहाळ्यासहित आंघोळ करत होता नारबा आज. लवकर उठून मोडलेल्या साखरझोपेचे दुःख कुठल्या कुठं विरून गेलं होतं. दररोज कपड्याचा साबण किंवा विना साबणाने आंघोळ करणाऱ्या नारबाने आज तीन वेळा सुवासिक साबण अंगाला लावून अंघोळ आटोपली.


आंघोळ झाल्यावर नारबाने कपडे अंगावर चढवले, आणि आता साबणाचा सुगंध येतो का ते पाहिले तर चक्क येत होता. आता त्याचे लक्ष काही गरमागरम खायला मिळते का याकडे लागले. आईने नारबाची आंघोळ होईपर्यंत गरमागरम बाजरीची भाकरी बनवून ठेवली होती. नारबा घरात शिरताच नारबाची आई बोलली, "नारबा, चल खाऊन घे आणि मंग जा बाह्येर". नारबाने होकारार्थी मान डोलावली, ताटली आणि पाण्याचा तांब्या भरून घेऊन खायला बसला
आजचा दिवस नारबासाठी एकंदरीत अगदी सुगंधिमय असाच होत होता. शाळेत जाण्याअगोदर, दुपारच्या सुट्टीत घरी आल्यावर, परत पुन्हा शाळा सुटल्यावर नारबाचे लक्ष फक्त त्या सुगंधी साबणाकडेच. रात्रीही झोपण्याआधी उद्याही आपल्याला अशी अंघोळ करायला मिळणार, या विचाराने नारबाला कधी झोप लागली त्याला कळालेच नाही
"नारबा उठेय, चल गोठयाव जायचंय, आवर पटक्यास". नारबाला झोपेत अस्पष्ट ऐकू येत होतं. त्याला वाटलं स्वप्न आहे कि काय म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. परत आणखी तसाच आवाज आला. आजही त्याची आई त्यालाच गुरांकडं चल म्हणत होती. पण वडील तर रात्री दारू पिलेच न्हवते, मग तरीही मलाच का आई चल म्हणतीये हे काही नारबाला उमजेना. अंथरुणावर पडूनच त्याने आईला नकार दिला. त्याबरोबरच त्याची आई त्याच्या जवळ आली आणि बोलली कि "आजबी तुलाच यायचंय, चल ऊठ लवकर" नारबाने आईकडे पाहिलं तर काहीतरी बिघडलय हे आईच्या चेहर्यावरील भावमुद्रेवरून नारबाच्या लक्षात आले. आता नारबापुढे काहीच पर्याय न्हवता.


नारबा बोलला, "आई तू व्हो पुढं, मी यतो मागणं
"न्हाय माझ्याबरच चल" नारबाची आई थोडंसं दमातच बोलली. मग मात्र नारबा उठला. आई त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात पकडून त्याला ओढत न्हाणीकडे आली. आता मात्र नारबा बुचकळ्यात पडला. आता पुढं नक्की काय घडणार याचं गणितच नारबाला लावता येईना
न्हाणीपाशी आल्यावर त्याची आई बोलली, "नारबा त्यो साबण घे, आणि खिशात घाल"
आता मात्र नारबाची पाचावर धारण बसली. काहीतरी प्रचंड घडणार याची कल्पना नारबाला यायला लागली. आईने सोडलेल्या फर्मानाप्रमाणे नारबाने साबण उचलून खिशात घातला. आणि नारबा आईसोबत चालायला लागला.
आईच्या डोळ्यातल्या तप्त झालेल्या चक्षुभास्करासमोर नभीचा भास्कर आज नारबाला फिका वाटला. आजही पक्ष्यांचा किलबीलाट एेकु येत होता. कुत्र्यांचा धावाधावीचा व्यायाम चालूच होता. रात्रभर डालून सोडलेल्या कोंबड्या इकडून तिकडं धावत होत्या, आणि तो कोंबडा आजही त्याचा तो बांग देण्याचा कार्यक्रम चालूच होता. नारबाने मागे वळून पाहिले. तेव्हा परत त्या कोंबड्याने परत बांग दिली, आता मात्र हा कोंबडा हे आपल्याला उचकवण्यासाठी करतोय की काय असंच नारबाला वाटलं, पण आज मात्र तो काही करू शकत न्हवता, गुपचूप आईसोबत चालणे याच्या शिवाय त्याला पर्याय न्हवता. मातीतून निघालेला सुगंध सकाळचे वातावरण अगदी ताजेतवाने करत होता, पण नारबाचे मात्र कशातच लक्ष न्हवते.


आईबरोबर चालताना नारबाच्या खिशातला साबण त्याच्या मांडीवर आदळायचा, तसतशी नारबाची भीती वाढायची. दोघेही  गोठ्यावर पोहोचले. नारबाच्या आईने नारबाचा हात सोडला आणि बोलली, "बादलीत पाणी घिऊन , आणि खिशातला साबण तिथं ठवून ." साबण असं आईने म्हटल्याबरोबर नारबाला एकदम अंधारून आलं. नारबाने पिछे मूड करून न्हाणी कडे प्रस्थान ठेवलं. सुदैवानं न्हाणीमध्ये कालसारखंच कुणी न्हवतं. पाण्याची बादली नळाखाली लावण्याअगोदर त्याने इकडे तिकडे पाहून खिशातला साबण काढून न्हाणीमध्ये ठेवला. आणि बादली भरायला लावली. नारबाच्या डोक्यात मात्र आता विचार चक्र जोराने फिरायला लागली. हे नक्की चाललंय काय आणि पुढं होणार काय याचा अंदाजच त्याला बांधता येईना. बादली भरली ती घेऊन नारबा परत गोठ्यात आला. आईने आजही त्याला शेणाची टोपली डोक्यावर उचलून दिली आणि नारबा उकिरड्याकडे चालायला लागला. आजही कचरा त्याच्या अंगावर सांडत होता आणि आजही त्याला त्याचे भान न्हवते. कारण काल अंगभरून सुवासिक साबणाने अंघोळ केली आणि आज अंगभरून मार खावा लागणार कि काय, अशी स्वप्नेच नारबाला दिवसा उजेडी दिसायला लागली. कचरा टाकून आल्यावर स्वच्छ हात धुवून नारबा धार काढायला बसला. आज कुणीच काही बोलत न्हवते. धार काढून झाल्यावर गुरांना खायला टाकून दोघेही घरी आले.


आज मात्र दूध घालण्याचे काम पांडू वर ढकलणे आपल्याला महागाचे पडू शकते, याची कल्पना नारबाला नक्कीच होती. नारबा कसलीच हुज्जत घालता थेट दूध घालायला डेअरीवर निघाला. घरी आल्यावर नक्की काय चित्रपट होणारे याचा अंदाज बांधणं अजून चालूच होतं. दूध डेअरीवर घालून नारबा घरी पोहोचला. दुधाची बादली खाली ठेवल्याचा आवाज आल्याबरोबर नारबाच्या आईने नारबाला घरात बोलावले. धडधड प्रचंड वाढली. उजेडातून आल्यामुळं घरात शिरल्या शिरल्या नारबाला काही दिसेना. आत आल्याबरोबर नारबाच्या आईने नारबाचा हात पकडला, आता मात्र नारबाने डोळेच मिटले, नारबाचे सगळे अवसानच गळाले होते. आणि आता मार खायची त्याच्या मनाने तयारी देखील केली होती. पण असे काहीच होत न्हवते, आईने त्याच्या हातावर वीस रुपयांची नोट ठेवली होती, आणि आई त्याला बोलली कि, "दुकानात जा आणि ईस रुपायात ईल त्यो वासाचा साबण घिऊन ." नारबाने डोळे उघडले तर खरेच त्याच्या हातावर वीस रुपयाची नोट होती. नारबाने होकारार्थी मान डोलावून तो दुकानाकडे निघाला. त्याने दुकानातून अंगाचा साबण घेतला आणि त्याचा वास घेऊन पाहिला कालच्या न्हाणीतून आणलेल्या साबणापेक्षा त्याला ह्या साबणाचा वास आणखीनच छान वाटला. पण सकाळी झोपेतून उठल्यापासून झालेल्या थराराचा विचार त्याच्या डोक्यातून अजून गेला न्हवता.


आपल्याला आईने आपल्या साबणचोरी बद्दल मारता, जे काही करवून घेतले. हे नक्की असे का केले असावे, हे जरा जरा नारबाला उमजायला लागले होते. रागावता, मारता नारबाने केलेली चूकिची कृती त्याच्या आईने त्याच पद्धतीने नारबाकडून दुरुस्त करवून घेतली होती. नारबाला आपण केलेली चूक लक्षात आली होती. पुन्हा आयुष्यात अशी चूक करायची नाही, असा चंग मनाशी बांधून नारबाने आजही सुवासिक साबणाने आंघोळ केली. आणि निदान साबण संपेपर्यंत तरी अशी सुवासिक अंघोळ तो दररोज करू शकणार होता

हि साबण चोरीची चूक नारबाच्या आईने डोळ्याखाली घातली नाही कारण अशीच जर सवय लागली तर ती कुठल्याच साबणाने धुवून निघणार नाही याची कल्पना नारबाच्या आईला असावी. मारून, रागावून संस्कार केले जातात ह्या गोष्टीला फाटा देऊन नारबावर अगदी आयुष्यभर उपयोगी पडेल असा संस्कार केलेल्या नारबाच्या आईला कोटी कोटी प्रणाम

ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि ब्लॉगला SUBSCRIBE करायला विसरू नका.

किशोर पवार 

९१५६७२०८७८

१२ महिने २४ किल्ले ! #1. गरुडाचे घरटे ! "तोरणगड" (प्रचंडगड)

१२ महिने २४ किल्ले १.  तोरणागड (प्रचंडगड) गरुडाचे घरटे  हिंदू संस्कृतीमध्ये सणवार आला कि घराभोवती आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचे त...